बुद्धी ठेवुन गहाण
लाकडे त्यांनी रचली
उदार मनाची होळी
जळण्यास होती सजली
कालबाह्य झाल्या आता
प्रथा त्या अग्निपुजनाच्या
नाही कळत का आठवणी
अजुनही त्या होलिकेच्या ?
म्हणे वासना, अहंकार,अविचार
असतात होळीत जाळायचे
का प्रतिकात्मक फसवे आधार
नाहक धर्माला जोडायचे ?
पर्यावरण, प्रदूषणावर
होते बोलत ते भरभरून
होळीला हात जोडत होते
थोडं दुर उभा राहुन
नैवेद्याची ती पुरणपोळी
अग्नीत भस्म झाली
भुकेल्याची नजर तेंव्हा
जणु हाय देवुन मेली
काळा उठलेला धूर
भयानक मला वाटला
गलिच्छ शिव्यांचा गोंधळ
बिभत्स मला भासला
काही ठिकाणी प्रथा
होमाची ती अघोरी
आठवुण जिवंत बळी
आली मला शिसारी
सर्पण आणि सरणातला
भेद होता मला कळला
पण होळी आणि चितेतला
फरक हळुहळू जळला.
डॉ .सुभाष कटकदौंड