कधी कधी घ्यावा लागतो
विनाकारण दोष तो सारा
आणि नाही टाळता येत तेंव्हा
मनाचा तो कोंडमारा
दूःख लपवुन कधी
लागतं खोटं हसावं
पण अत्यानंदाने हसल्यावर
त्या डोळ्यांनी का फसावं ?
कधी वाटतं सुंदर जीवनाला
असेल काहीतरी अर्थ
मग का कधी वाटतं
आहे हे सारे व्यर्थ ?
कधी वाटतं घ्यावी भरारी
ऊंच त्या आकाशात
का कधी येतं अंधारून
तेजस्वी त्या प्रकाशात ?
कधी कधी वाटतं
अगदी शांत बसावं
आणि का कधी एकांतात
मनानं त्या उदास रूसावं ?
कधी कधी वाटतं
आहे मी समर्थ
का घडतो कधी
मग अनपेक्षित अनर्थ ?
कधी वर्षामागुन वर्ष
जातात लगेच सरून
आणि कधी जड जातो दिवस
आणि रात्री येतं भरून
कधी कधी वाटतं आहे
फसवा खेळ हा सारा
आकस्मित जावं लागेल सोडून
केलेला हा पसारा
डॉ. सुभाष कटकदौंड – खोपोली
Khupach Sundar vichar aahet
LikeLike