आठवतय ना आई तुला,
आपण तेंव्हा होतो
छोट्या गावात रहायला
शिक्षणासाठी बाहेर मी
यायचो चार दिवस घराला
एका सुट्टीत झाली होती
माझी परतीची वेळ
अन् बाबा होते परगावाला
आई, तू पदर खोचून
लागलीस मग तयारीला
मी होतो काळजीत
अन जरासा चिंतातूर
कारण बस स्टॉप होते
घरापासून थोडे दूर
माझ्या साऱ्या सामानांचे
थोडे जास्तच होते वजन
जावं लागणार होतं चालत
ना रिक्षा ना वाहन
पुस्तकाचं जड ओझं
घेतलंस तू डोक्यावर
भासलं, माझं ओझं
घेतलंस तू खांद्यावर
जबाबदारीच ओझं घेऊन
आत्मविश्वासाने चाललीस
जाणवलं मला तेंव्हा,
तू माझा बाप झालीस
पण आई…
जेंव्हा बाबा अचानक
कायमचे सोडून गेले
तुझ्या दूःखाचं ओझं
नाही ग मी उचलले
विरहाच्या त्या आघाताने
माझेच पाय लटपटले
खचलेलं तुझं ते मन
नाही ग मला समजले
चुकांचे ते ओझे आता
खुपच ग जड झाले
का गेलीस तू न सांगता
कोडं आज उमजले
नकळत झाली ग चुक
माफ कर तू मला
ये तू माघारी आता
अन् पोटात घे ग मला
डाॅ. सुभाष कटकदौंड – खोपोली