जिवंत तुझ्यावर कधी आई,
चार ओळी नाही लिहिल्या
तू गेल्यावर, आठवणी तुझ्या
साऱ्या धावुन आल्या
तुझ्या डोळ्यांतल्या वेदना
नव्हत्या मला दिसल्या
उदास तुझ्या चेहऱ्यावर
खोटं होत्या हसल्या
तू नाहीस आणि आता
वेदना तुझ्या त्या शमल्या
तू गेल्यावर आठवणी तुझ्या
साऱ्या धावुन आल्या
लहानपणीच्या साऱ्या त्या
गोष्टी होत्या विसरल्या
तू गेलीस सोडून आणि
साऱ्या साऱ्या त्या आठवल्या
तुझ्या त्या आवडीच्या कविता
आज कानी गुणगुणल्या
तू गेल्यावर आठवणी तुझ्या
साऱ्या धावुन आल्या
अपुऱ्या तुझ्या सुप्त ईच्छा
मुक्याने होत्या रडल्या
विरहाच्या त्या भावना
नव्हत्या लपू शकल्या
कोरड्या जीवनाच्या छटा
तुझ्या डोळ्यात होत्या दिसल्या
तू गेल्यावर आठवणी तुझ्या
साऱ्या धावुन आल्या
बारीक सारीक सर्व नोंदी
होत्या तुला चिकटल्या
जुन्या आठवणींच्या गप्पा
नेहमी तुझ्याजवळ रमल्या
निरोपाच्या त्या संवेदना
नव्हत्या ग मला जाणवल्या
तू गेल्यावर आठवणी तुझ्या
साऱ्या धावुन आल्या
– डाॅ. सुभाष कटकदौंड – खोपोली